कौमार्य शस्त्रक्रियेसाठी तरुणी मोजताहेत हजारो रुपये….
एकीकडे कौमार्य चाचणीवरून कंजारभाट समाजातील तरुणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरुणींकडूनच ‘कौमार्य ‘ पुनर्प्राप्तीसाठी हजारो रुपये मोजले जात आहेत . पुण्या – मुंबईमध्ये वर्षाला जवळपास २० ते ३० तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
खरंतर स्त्रीचं योनिपटल ‘ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे, तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग , खेळ किंवा व्यायामानेदेखील आतला पापुद्रा फाटू शकतो. हे सत्य वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे . महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘ कौमार्य चाचणी अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘ कौमार्य ‘ विषयीचा दृष्टिकोन बदलू शकलेला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कंजारभाट समाजात तरुणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले . मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही , हे तरुणींकडून कौमार्य पुनर्प्राप्तीसाठी केल्या जाणा -या शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे .
यासंदर्भात कॉस्मॅटिक व प्लॅस्टिक सर्जन डॉ . पराग सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद साधला असता तरुणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचे कुणाशीतरी शरीरसंबंध आले असतात, पण आता त्यांचे दुस-या तरुणाबरोबर लग्न होणार असते, त्यामुळे कौमार्य त्यांना परत हवे असते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी ज्या पापुद्र्याचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो, तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फार काळ टिकत नाहीत. तसेेेेच शरीरसंबंधांनंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र काही बुरसटलेल्या समाजाच्या डोक्यातून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरुणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. कौमार्य पुनर्प्राप्तीसाठी विविध वर्गातील तरुणी हजारो रुपये मोजायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले .
बातमीचा स्त्रोत : लोकमत न्यूज नेटवर्क , १६ मे २०१९
कौमार्य चाचणी घ्याल तर, लैंगिक हिंसाचाराचा गुन्हा नोंद होणार!!