मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?

एक खरीखुरी गोष्ट . . .  काही दिवसांपूर्वीच एक गृहस्थ भेटले. घरी भरपूर श्रीमंती, या श्रीमंतीच्या जोरावर ते त्यांच्या मतिमंद मुलाचे लग्न करण्याच्या अट्टाहासाला पेटले होते. यातली वाईट आणि मनाला हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यात शिजत असणारा प्लॅन. त्यांनी एका अनाथ व गरीब मुलीचा लहानपणापासून सांभाळ केला होता. आता ही मुलगी दहावीमध्ये शिकत होती. आता त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न या नॉर्मल मुलीशी लावून देण्याचे वेध लागले होते. किंबहुना त्यासाठीच त्यांनी या मुलीला लहानपणापासून ‘पाळून’ ठेवले आहे, असं ते म्हणतात. त्या मुलीला कशाचीच कमी पडणार नाही, सगळं तिचंच आहे. त्यामुळे ती नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही यावर त्याचे ते ठाम होते.  तिचं वय, तिचं मत, तिची शारीरिक, मानसिक प्रगल्भता याचा कुठलाही सारासार विचार न करता त्यांनी सगळंच ठरवून टाकले आहे. असं त्यांच्या बोलण्यावरुन स्पष्टपणे जाणवत होतं. याउलट नकार देण्याची संधीच ते गृहस्थ तिला देणार नव्हते असं लक्षात येत होते. शिवाय इतरांचे काही ऐकायला ते तयारही नव्हते. बहुधा दहावीतल्या मुलीची शारीरिक, मानसिक अपरिपक्वता समजून घेण्याच्या भूमिकेतून त्यांच्या डॉक्टर मुलीने आणि डॉक्टर जावयाने या लग्नाला केलेला विरोधही या गृहस्थांना त्यांचा प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव वाटत होता. ही २०१४ सालात आपल्याच आजूबाजूला घडणारी एक गोष्ट आहे. एकीकडे आपण जग पुढे जात आहे. माणूस प्रगती करत आहे…. अशी वाक्य ऐकत असतो, बोलत असतो. काही माणस पैशानं अधिकाधिक श्रीमंत होत असतीलही पण आपण विचारांनी मात्र मागास आणि स्वार्थी बनत चाललो आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मात्र चांगल्या विचारांची पायाभरणी करायला सुरुवात करायला पाहिजे, कारण आजच्या घडीला त्याचीच अधिक निकड निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यातल्या एका गावातली घटना… आई-बापांनी आपल्या मतिमंद पोरीचं लग्न एका सामान्य मुलाशी लावून दिलं. पोरीच्या मतिमंदत्वाची कल्पना सासरच्या मंडळींना दिली नव्हतीच. परिणामी नव-याने काही महिन्यांतच तिला सोडून दिलं, पण तोपर्यंत तिला शरीरसुखाची जाणीव झाली होती, नव-याने सोडून दिल्यानंतर मात्र शरीरसुखापासून वंचित राहणे तिला अवघड जात होते. आई-बापाचं घर सोडून नव-याच्या घरी जाणं, तिथं रुळण्याचा प्रयत्न करणं, पुन्हा कायमचे आई-बापाकडे येणं या सगळ्या घडामोडीमध्ये तिच्या आयुष्याची घडी तर विस्कटली होतीच पण आता भावनिक घुसमटही वाट्याला आली होती. पोरीचं लग्न करण्याच्या अट्टाहासातून, शिवाय फसवणूकीतून लग्न लावून देऊन शेवटी आई-बापाच्या हाती काय लागलं?

मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?  हा तसा कायमचाच चर्चेचा प्रश्न आहे. काही मतिमंद  मुला-मुलींनाही त्यांचं लग्न व्हावं, बाळ व्हावं असं वाटत असतं. स्वतःच्या लग्नाबद्दल मुलं घरात विचारपूस करतात. काही वेळा माझ्याशी लग्न करशील का? असे मुलगा किंवा मुलगी कुणालाही विचारतात. मुलांच्या अशा पद्धतीने व्यक्त होण्यामुळे त्यांच्यातील या भावना कशा हाताळायच्या असा प्रश्न पालकांसमोर असतो.

हे घडण्यापूर्वी घ्यावयाची काळजी म्हणजे लग्नाबाबत मतिमंद मुलांशी चेष्टा करणं टाळावं. लग्न म्हणजे नवे कपडे घालणं, लाडू खाणं, सगळ्यांनी आपलं कौतुक करणं असाच अर्थ मतिमंद मुला-मुलींच्या मनात ठसलेला असण्याची शक्यता अधिक असते. कारण हेच त्यांनी लग्न समारंभात अनुभवलेलं असतं. यापलीकडे लग्न म्हणजे काय हे समजायला त्यांची बौध्दिक क्षमता कमी पडते. तसंच लग्नामुळे आणि आई-वडील होण्यामुळे येणाया जबाबदा-या पार पाडण्याची क्षमता या मुला-मुलींमध्ये नसते.  या आनंदापासून दूर राहावं लागत असल्याने त्यांचा भावनिक कोंडमारा होण्याची शक्यता असते. खासकरून मुलांच्या मनात निर्माण होणा-या या भावनांमुळे घरातील तरुण स्त्रियांना (भावाची पत्नी) असुरक्षित वाटत असतं

लग्नाशिवाय स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध करणे हे भारतीय समाजात आजही स्वीकारार्ह नाही. त्यामुळे मतिमंद मुला-मुलींची शारीरिक किंवा लैंगिक गरज भागविण्यासाठी लग्न करुन देणं हे गृहीत धरलं जातं. असाच पालकांचा दृष्टिकोन असतो. शिवाय आपल्यानंतर मुलाची या मुलीची काळजी कोण घेणार असा प्रश्न पालकांपुढे असतोच. त्यासाठी आपलं जवळचं माणूस असावं या भूमिकेतूनही अनेक पालक मतिमंद मुला-मुलींची लग्न करुन देयासाठी अनुकूल असतात.

मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?

अनेकदा मतिमंद मुला- मुलींच्या लैंगिक संबंधांसाठी लग्न हा पर्याय निवडला जात असावा. या मुला-मुलींच्या लग्नाचा विचार करताना संबंधित मुलाची किंवा मुलीची भावनिक आणि बौद्धिक क्षमता, त्याला किंवा तिला असणारा कौटुंबिक आधार, आर्थिक पाठिंबा आणि सहकार्य अशा सर्व गोष्टींचाही विचार करुन लग्नाचा निर्णय घ्यावा. लग्नाच्या नात्यात एकमेकांबद्दल प्रेमभावना असते. प्रेमभावनेतून एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, बोलणं, वागणं आवडत असतं. यात त्या व्यक्तीचा आदर, विश्वास, आपुलकी, काळजी अशा विविध भावनांची, मूल्याची गुंतवणूक असते. प्रेमात अंतर्भूत असणा-या या विविध भावना, मूल्य, विचार मतिमंद मुलांना समजण्यात मर्यादा येतात.

कायद्याने या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असे आहे. तरीही अगदी काही मुलं-मुली अश्या इतरांच्या मदतीने वैवाहिक जीवन जगू शकतात. अपवादात्मक केसमध्येच तज्ञांच्या सल्याने/मार्गदर्शनाने मुलांच्या लग्नाचे निर्णय होणे उचित ठरु शकतं. यातही मतिमंद मुलाचं आणि मतिमंद मुलीचं एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करणं योग्य ठरू शकते. तरीही मुलगा व मुलगी यांच्या बौद्धिक क्षमता, त्याची व्यक्तिमत्वं, त्यांच्या सवयी, गुण-दोष, त्यांचे आजार, दोघांनाही उपलब्ध असणारा कौटुंबिक आधार या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करण्याची गरज असते. मात्र कुणाशीही फसवणूक करुन या मुला-मुलींची लग्न करु नयेत. हे त्या दुस-या व्यक्तीसाठी आणि या मुला-मुलींसाठीही त्रासदायक ठरु शकतं.

मतिमंद मुलाचं आणि मतिमंद मुलीचं परस्परांशी लग्न करताना आणि केल्यावर काय काळजी घ्यावी.

१) मुलाच्या आणि मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करावी. तसेच लग्न नोंदणी पध्दतीने,  किमान खर्चात केल्यास या मुलांच्या भविष्यासाठीच्या आर्थिक तरतुदीत भर पडते.

२) या जोडप्याला अपत्य झाले तर त्याची काळजी, जबाबदारी घेता येईल का याबाबत नीट विचार करावा.

३) दोन्हीकडच्या पालकांनी समान जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक कारणांवरुन कटुता येणार नाही याची दक्षता घ्यावी.

४) जोडप्याला वसतिगृहात राहावं लागणार असेल तर पालकांच्या पश्चातही त्यांना पती-पत्नी या नात्याने राहता येईल अशी व्यवस्था करावी.

५) दोघांमध्ये मतभेद असतील किंवा पटत नसेल तर वेळीच घटस्फोट घ्यावा.

संबंधित मुला-मुलीचे पालक, नातेवाईक यांच्यातील सामंजस्यावर, सहकार्यावरच हा पर्याय प्रत्यक्षात येऊ शकेल. दोघांच्या सहजीवनाबाबतीत अशा काही गोष्टींचा विचार करुन त्यांचे आयुष्य भावनिकदृष्टया स्थिर करण्याचा प्रयत्न पालक करू शकतात.

हे झालं लग्नाबाबत … पण अशा जोड्प्यांना शारीरिक संबंध करायला जमेल का? अन त्यांना  मूल होऊ द्यावं की नाही? शारीरिक संबंध न करताही या मुलांना sexual pleasure कसा मिळू शकतो. या अन अशा अनेक विषयांसाठी लवकरच घेऊन येत आहोत पुढील लेख आवर्जुन वाचा.


संदर्भ :
वरील संपादित  लेख तथापि ट्रस्टच्या ‘शरीर साक्षरता  सर्वांसाठी ‘  या  मतिमंद मुला – मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तकातील आहे.

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

8 Responses

  1. Dev says:

    माझा विवाह गतिमंद असलेल्या मुलीशी झालेला आहे. तिचा बुध्यांक हा ५८ आहे. माझी फसवणूक केली आहे, सासरच्या सर्वानी माझ्या वर खूप आरोप केला की, तुमच्या कडे पाठविली तेव्हा पासुन ती आशी झाली. तुम्ही तिला वेड केले. पाेलिस स्टेशन तक्रारी केल्या, मला व आई ला खुप फार, व तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. नंतर आम्हाला काही समजत नव्हते. एका डॉ. सल्ला दिला, की तुम्ही तिला एकदा दवाखान्यात दाखवून बघा, तेव्हा आम्हाला समजले.
    नंतर तिला तिच्या घरी परत पाठविले, तिच्या वडीलांनी तिला खूप मारुन आमच्या कडे पाठविली, तेव्हा तिने सर्व सांगितले. व मला एक मुल होऊ द्यावे अशी विनंती केली, व नंतर मी वेगळी राहील, तुम्ही दुसरा विवाह करा असे म्हणाली, आज मला एक मुलगी आहे पण तिचा संभाळ करण्यासाठी ती समर्थ नाही. आता सासर कडील सर्व गप्प बसून अबोला धरतात. तिला वेड म्हणून सोडून दिले, आपल्या जबाबदारी माझ्यावर टाकुन मला भांडत असतात. मी तिचा संभाळ करण्यासाठी तयार आहे, पण मुलीच्या वडीलांची काही जबाबदारी नाही का? माझ ❓

  2. Prajakta Dhumal says:

    या लेखाचा स्रोत काय आहे??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap